एकीकडे हवामान बदलाचे भयानक स्वरूप आपण अनुभवत असताना त्याला कारणीभूत असणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक असलेल्या कचऱ्याबाबत आपण अजूनही उदासीन आहोत.
आपण कधी विचार केला आहे की कचरा एकदा आपल्या घरातून निघून गेला की त्याचे काय होते? तो गूढपणे अदृश्य होत नाही. आपल्या घरातला कचरा आपल्या नजरेसमोरून गेला की आपली जबाबदारी संपली असा आपला समज झाला आहे. त्या कचऱ्याचे पुढे काय होते, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, त्यावर कोणत्या प्रक्रिया केल्या जातात याबद्दल फारसे काही माहित नसते.काही सामाजिक संस्था, स्वयंसेवक,विद्यार्थी कचऱ्याच्या समस्या हाताळण्यासाठी व कचऱ्याबाबतची जागरूकता वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. तरी देखील वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने हे जाणून घेणे गरजेचे आहे की आपल्या घरातून बाहेर पडलेल्या कचऱ्याचे पुढे काय होते.